Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -८

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -८

विशेष सूचनाः

१. आज रियुनियनला बरोबर दोन महिने पुर्ण होत आहेत. सात भागांच्या सतत लेखनानंतर हा आठवा भाग लिहीतांना थकवा जाणवत होता.तो घालवण्यासठी एक बदल म्हणून थोडी वेगळी चव या भागाअखेर देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे जसे २ महिने सांभाळून घेतले तसेच सांभाळून घ्यावे.

२. आम्ही विनोदनिर्मीतीसाठी आजपर्यंत यथेच्छ वापरलेल्या या कथानकातल्या मुख्य पात्रांपैकी टाकळकर,निलेश व विनायक कुलकर्णी ह्यांनी आमचे लेखन अजून वाचलेच नसल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समजत आहे.व विशेष म्हणजे आमचा एकही लेख न वाचता स्वतःविषयी व आमच्याविषयी असलेल्या प्रचंड आत्मविश्वासापायी विनायकरावांनी आम्हाला `प्रिंट आउट काढून विनोद शक्यतोवर लाल शाईने अधोरेखीत करून द्या’ असा प्रेमळ निरोप दिला आहे. त्यांनी स्वतःवरचे विनोद वाचून आमच्यावर राजकीय दबाव आणण्याच्या आधीच त्यांच्यावर पुन्हा विनोद लिहून सुड उगवून ठेवायचा मोठा चतुर निर्णय प्रस्तुत लेखकाने घेतला आहे.

आता पुढे….

लोणावळ्याची सरहद्द सुरु होताच अंगापिंडाने चांगला भरलेला हायवे अचानकच कुपोषीत बालकासारखा वाटायला लागला.चांगल्या ९०-१०० च्या वेगाने चालणारी आमची कार लोणावळा सुरु होताच १०-२० च्या वेगाने(?) रांगायला लागली. रस्त्यावर अचानकच गर्दी वाढल्याचे जाणवले.ती गर्दी फक्त `भाऊ’ गर्दी नसून त्यात अंगावर घालायच्या सगळ्यात लहान कपड्यातल्या जाहितातीतल्या वाटाव्यात अशा अनेक तुमच्या सगळ्यांच्या `ताया’ ही होत्या. विनायक, एखाद्या लहान भुकेल्या मुलाने आशाळभूत नजरेने मिठाईच्या दुकानातल्या भरलेल्या ताटांकडे पहावे तसे, एका चिक्कीच्या दुकानात एक टक आपले दोन्ही हात काचेवर ठेऊन बघत होता.`सकाळपासून सिगरेटशिवाय काहीही खाल्ले प्यायले नाही हो आमच्या विनुबाळाने ‘ असले काही कनवाळू विचार माझ्या मनात डोकवले असता `व्वा ! काय छान आहे` असे उदगार त्याने काढले.चिक्कीच्या एकंदर गुणवत्तेची एवढ्या लांबून त्याने केलेली मिमांसा व त्यावरचे मतप्रदर्शन जर आमच्या सौ.नी ऐकले असते तर `बघा..नाहीतर तुम्ही..साधा ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीतला फरक ओळखू येत नाही’ असे ताबडतोब ऐकायला मिळाले असते.आता आमच्या हिच्या ज्वारी, बाजरी, बेसण, गहू, पुरण, मका, कोथिंबीर, गाजर,बीट,कारलं,सोयाबीण व स्वतःचे केस एकत्र करून केलेली `पौष्टिक’ भाकरी जर ब्रम्हदेवानेही ही` ज्वारीची का बाजरीची’ एवढ्याच तपशिलात ओळखून दाखवली तर मी रणजित देशमुखांची झुपकेदार मिशी लिलावात विकायला करायला तयार आहे.असो, तर विनायकचे गुणवत्तेविषयीचे उदगार चिक्कीविषयी नसून तंग कपड्यात चिक्की खरेदी `करणारी’ विषयीचे होते हे लक्षात आले.इतक्या गर्दीत आपल्याला हवे ते हेरण्याच्या, त्या चश्मा लावल्याने अधिक तीक्ष्ण झालेल्या ,चार डोळ्यांच्या `चौफेर’ नजरेलाही आमचा मानाचा मुजरा.

लोणावळ्यात आम्ही जसे आत शिरत गेलो तसे गाडी इतकी मंदावली की शेजारून जाणारे सायकलवालेही आम्हाला ओव्हरटेक करत होते.एका ठिकाणी जेव्हा दोन चालणा-या माणसांनीही आम्हाला मागे सारले तेव्हा मात्र आपली कार थांबली असल्याचा एक मोठा चतुर अंदाज मी अचूक बांधला.लवकरच हा ट्रॅफिक जॅम आहे असा एक सार्वजनिक खुलासा झाला.पाउस व चिखल यामुळे चिक्की खरेदी करण्यासाठी थांबलेल्या काही हायवे प्रवास्यांनी आपाआपल्या गाड्या बाजूला दाबून न लावता भर रस्त्यात `बघू कोणात दम आहे आम्हाला बाजूला करायचा ‘अशा थाटात लावल्या होत्या.प्रत्येक गाडी आपल्या लगेच पुढे असणा-या गाडीला उद्देशून दात ओठ खात कर्कश्य हॉर्न वाजवित होती व त्या सगळ्या गाड्यांच्या त्या आवाजातून युद्धभुमीवर व्हावा तसा एक शंखनाद तयार झाला.मग चिक्की खरेदीसाठी उतरलेल्या प्रवाशांच्या दुकानदाराशी झालेल्या वाटाघाटी,चर्चा,चिक्कीची चव,त्यावरील समिक्षा,मग त्यावर होणारे मतभेद आणि सगळ्यात शेवटी चिक्कीच्या पिशव्यांची झालेली अदलाबदल असा एक पुर्ण कथा लिहीता यावी असा परिसंवाद त्या दुकानांवर चाललेला दिसला.
आपल्यामुळे रस्त्यावर काही हल्लकल्लोळ झाला आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती हे मघाच्या त्या चिक्कीवाल्या सौंदर्यवतीच्या तोंडात मोठ्या लाडाने एक विंग्रजाळलेला थ्री फोर्थ विथ गॉगल तरुण चिक्की भरवतांना दिसल्याने समजले.खुल्या आसमंतात चाललेल्या या प्रणयक्रीडेकडे बघून इकडे आमची मराठमोळी थ्री फोर्थ मात्र आमच्या शेजारी बोटं मोडत बसलेली होती. मग काही मंडळीनी कारखाली उतरुन `चिक्की’क्षक गि-हाईकांना त्यांच्या या खरेदी दरम्यान रस्त्यावर निर्माण झालेल्या वाहतुकीच्या गळाचेपीची प्राथमिक माहीती दिल्यावर मग त्यांची या मंडळींसोबत उच्च माध्यमिकपातळीवरची बाचाबाची सुरू झाली.प्रत्येकाचा सुर हा `हा ट्रॅफिक जाम आमच्यामुळे झालेला नाही तर समोरच्यामुळे झाला’ असा होता.`आम्ही तर ट्रॅफिक जाम झाल्याय तोवर चिक्की खरेदी करावी म्हणून थांबलो’ असा त्यांचा युक्तीवाद होता.वादविवाद रंगत जाऊन एकमेकांच्या आई वडिलांची मोठ्या आस्थेने चौकशी सुरू झाली आणी आता हा वाद कुस्तीच्या फडात रुपांतरीत होणार अशी चिन्हे दिसायला लागली.मग काही जाणकारांनी मध्यस्थी करुन एकदाची ही कोंडी फोडावी म्हणून कोंडीच्या मुळाचा तपास करत करत ही चौकशी ब-याच पुढे उभे असणा-या एका खेचरावर ( मराठीत गाढव ) येऊन थांबली.
ते बिचारे दुकाना पलीकडे असणा-या एका गाढविणीकडे भान हरपून बघत उभे होते. तिच्याकडे बघताना मागे अचानक झालेल्या गलक्याने त्याची तपश्चर्या भंग झाली व इतकी गर्दी मागे पाहून त्याने तिथेच थांबण्याचा `गाढवपणा’ न करता तिथून `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ असले अस्सल डॉल्बी साऊंड सिस्टिमला लाजवणारे आवाज काढत तेथून धूम ठोकली.त्याच्या या `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ ला गाढविणीनेही `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ असा आर्त सुरात स्टिरीयोफोनिक प्रतिसाद देउन जणू `कोई पत्थर से ना मारे मेरे दिवाने को..’ अशी आम्हाला करूणरसात याचना केली.त्या आर्ततेमुळे `माणुस’की दाखवत आम्ही त्यांना जाऊ दिले. यामुळेच कदाचीत आजही असेच एखादे गाढव गाढवीण पटवायचा एक हमखास इलाज म्हणून लोणावळ्याच्या त्या हायवे वर गाड्या अडवतांना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.
गाढव नजरेआड झाल्यावर आता लगेच वाहतुक सुरळीत होणार असा कयास बांधत आम्ही सावरून बसलो असता अचानक चहू बाजूंनी आपआपल्या गाड्या पुढे रेटण्याची जणू शर्यतच सगळ्यांमध्ये लागली. पण यावेळी आयत्या वेळी बाजूला होण्याचा योग्य निर्णय घ्यायला `गाढव’ समोर नसल्याने पुर्वीपेक्षाही मोठा पुर्णपणे मानवनिर्मीत ट्रॅफिक जाम तयार झाला.मग पुढची १५ मिनीटे आपआपली चालनक्षमता,शौर्य,चिकाटी,कोणाला धक्का लागला तरी दुर्लक्ष करायचा निलाजरेपणा,दंडातील स्नायूंची बळकटता,`अबे बाजू हट’ हे ओरडतांना लागणारे आवाजातले प्राबल्य,हॉर्न वर हाताचे दहा व अति गरज पडल्यास पायाचेही बोटं वापरून तो दाबून भयंकर आवाज करत गाडी दामटवण्याची हातोटी या किमान कौशल्यावर मदार ठेवून गाडी पुढे काढण्याची प्रक्रीया पार पडली.

त्या ऐतिहासीक एल ऍंड टी फाट्यावर आल्यावर आमची कार गर्रकन उजवीकडे वळली .वास्तवीक हा पुर्ण परिसर मी पहिल्यांदाच बघत होतो पण इतक्या वेळ मनिष ने वेगवेगळ्या कॉल ला दिलेली उत्तरे मला पाठ झाली होती.त्यामुळे मला माझा हा पुनर्जन्म आहे व मला मागच्या जन्मी माझे वास्तव्य असणा-या या खुणा, हे उखडलेले रस्ते,हे एल ऍंड टी चे गेट, हाच तो पुल, हाच तो लांब दिसणारा तलाव, हाच तो सरळ दरीत जाणारा रस्ता असे भास व्ह्यायला लागले..कानात ` एक हशीना थी एक दिवाना था…क्या उमर.. क्या समा.. क्या जमाना था….’ असे गाणे थेट किशोरदांच्या आवाजात घुमायला लागले( हशीना हा शब्द आपले लाडके मराठी नेते `समश्या’ शब्द वापरतात त्यावरून प्रेरित होऊन घेतला आहे त्याला व्याकरणाची नव्हे तर राजकारणाची चुक समजावी).पण नंतर पुन्हा अंगापिंडाने भरलेली,खात्यापित्या घरातली,रंगानी थोडीशी कमी पण देखणी,मादक चालीची,चंचल नजरेची,आकर्षक, थोडक्यात पाहताक्षणी कोणीही प्रेमात पडावी अशी आनंदरावांची सुमोसदृश्य गाडी आम्हाला दिसली.यावेळी त्यांनी ती एका निर्जन पुलावर उभी केलेली होती.त्या धुंद वातावरणात व त्या रम्य स्थळी ती अतिशय `पुल’कीत झालेली वाटली.तिच्या या दर्शनाने मी वास्तवात परत आलो.

आम्ही `ती’ ला पुलावर पार करून गेलो तेव्हा गाडीत कोणीही दिसले नाही.त्यामुळे चार डॉक्टरांच्या फौजेने `ति’च्या वरून वादविवाद होऊन एकमेकांना पुलाखाली ढकलत जीव दिला कि काय अशी एक कवी कल्पना मनात आली असतानाच गाडीच्या पलीकडून एका काचेच्या पेल्याची दुस-या काचेच्या पेल्याशी धडक झाल्याने जसा आवाज येतो तसा आवाज आल्याने सगळं `बरच’ चालू असल्याची खात्री झाली आणि जिवात जिव आला.आम्ही पुढे आल्यावर वेगवेगळ्या बंगल्यांसमोर वेगवेगळ्या नट नट्यांची नावे घेत मनिष एखाद्या गाईडने द्यावी तशी माहिती देत होता.`अरे हा सलमान चा बंगला..हा शाहरूखचा…तो एकदम मोठा ..हा..तो रे सगळ्यात उंच हा..तोच ..तो जलसा आपल्या अमिताभचा…परवाच येऊन गेला म्हणे तो…मनिष तेथील वॉचमनकडून रोज रात्री ब्रेकींग न्यूज मिळत असल्यासारखा सांगत होता.आणि हा….हा महितीये कोणाचाय तो…`मनिष हे बोलताना त्याच्या गव्हाळ वर्णावरही मला लाली चढल्यासारखी वाटली.(पुर्वी लाल गहू अमेरिकेतुन यायचे म्हणे ते हेच की काय असे वाटले).हा बिपाशा चा..हे बोलताना मनिष पाडळकर ,वय वर्षे ३८..दोन मुलांचा बाप..आपल्या स्टेअरींवरील डाव्या हाताने व्हील कॅप वरचा निघालेला एक दोरा बोटाभोवती लपेटत होता…तो लाजत होता हयावरुनच तो औरंगाबादच्या कौटुंबिक जाचापासून( वहिनी माफ करा सत्य खरंच कटू असतं) शरीरानेच नव्हे तर मनानेही खुप दूर लोणावळ्यात येऊन पोहोचलेला आहे याची प्रचिती आली. आम्हीही भक्तिभावाने त्या बंगल्याकडे बघितले.सचिन टाकळकर ने तर या भक्तिरसात डुंबून त्या बंगल्याचा नमस्कार वगैरे केल्याचा मला भास झाला.विनायक ची शोधक नजर त्या बंगल्याच्या आत डोकावण्याची काही शक्यता आहे का हे पाहू लागली.. इतक्या वेळ निर्विकार पणे बसलेले संसारमहर्षी सचिन काळे अचानकच सावरत बसले व `कुठेय कुठेय’ असे म्हणत पुढे सरसावले व हा फक्त बंगला आहे आत बिपाशा नाही हे समजल्यावर खा-या(विषय बिपाशा संदर्भातला असल्याने नमकीन) शेंगदाण्यातला एखादा खौट लागावा त्याप्रमाणे कडवट चेहेरा करून पुन्हा मागे टेकून बसले.

त्या अरूंद कच्च्या रस्त्यावरून मार्ग काढत आमची गाडी ऑर्चर्ड रिसोर्टच्या गेटमधून आत आली व मनिष ने मोठ्या स्टाईलने गाडी पार्कींगमध्ये लावली. पाय जमिनीवर ठेवले आणी एका वेगळ्याच विश्वात,वातावरणात आपण आलेले आहोत याचा अनुभव आला.आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यात आकंठ बुडुन जात माझे मन विचारांच्या झोक्यावर झुलू लागले…..दरवर्षी येथे न चुकता घडणा-या एका कथेचा फास्ट फॉरवर्ड रिप्ले माझ्या डोळ्यासमोरून सरकला…..

….पांढ-या शुभ्र रिसॉर्ट च्या त्या इमारतीला त्याच्या समोर व आजुबाजूला असणारा निसर्गाचा सहवास कमालीचा खुलून दिसत होता.इमारती समोर असणारी टेकडी तिचा रोजचा सखा असणा-या घोंगावणा-या वा-याशी दवामध्ये चिंब होऊन रासक्रिडा करत होत्या.सारखे भिजून हुडहुडी भरू नये म्हणून तिने हिरवेगार उबदार `हरिततृणाच्या मखमलीचा’ शालू घातलेला होता.त्या दोघांच्या या प्रेमाला कोणाची नजर लागू नये असे वाटत असतानाच अचानक कुठूनतरी पांढरे ढग गोळा झाले.प्रथमदर्शनी ढगांचे वागणे `सोबर’ वाटल्याने वा-याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व त्यांना हुसकाऊन लावले नाही.हळूहळू टेकडीच्या अप्रतीम सौंदर्याने पाघळून जाउन ढगाच्या मनात `काळं’ साठायला सुरूवात झाली. मग एकतर्फी प्रेमातून ढग टेकडीशी सलगी करू लागले.वेगवेगळ्या प्रदेशातल्या दुषित वायूंनी बरबटलेली त्या ढगांची नजर टेकडीला सरळ वाटली नाही.तिने आपल्या सख्या, वा-याला, याची भितभितच कल्पना दिली.अपेक्षेप्रमाणे वारा संतापला त्याने कोणाचीही मदत न घेता सरळ ढगांवर हल्ला चढवला.पण आज ढग पुर्ण अस्त्र सोबत घेऊन आले होते.खुप वेळ तुंबळ युद्ध झाल्यावर ढगाने आपले शेवटचे हत्यार म्हणजे विज अस्त्र बाहेर काढले व त्याने कडाड….असा आवाज काढत वा-यावर प्रतिहल्ला चढवला व एकहाती झुंज देत पुर्णपणे थकलेला वारा हळू हळू करत मुर्छीत होऊन पडला.आपल्या प्राणप्रिय वा-याचा झालेला हा असा करूण अंत पाहून टेकडी ओक्साबोक्षी रडू लागली.तिच्या डोळ्यातून निघणा-या त्या अश्रुंचा बांध फुटला व ओहोळ,ओढे बनून वाहू लागला.त्यावेळी टेकडीच्या नकाराने रागावलेल्या ढगांनी आपल्या जबरदस्त शक्तीच्या जोरावर तिच्यावर तिरस्काराचा पाउस पाडायला सुरुवात केली.टेकडी त्या पावसाने पार भिजून गेली.पण स्वतःच्या अंगावरच्या हिरव्यागार शालूचा पदर थोडाही ढळू न देता खंबीरपणे तशीच उभी राहीली.हिला आता आपल्याशिवाय कोणी नाही असे वाटून पावसाने तिला चांगलीच झोडपून काढली पण टेकडीने आपले शील सांभाळले.एका आदर्श पतिव्रतेप्रमाणे ढगांनी दिलेल्या या यातनांचा निश्चलपणे सामना करत टेकडी सुर्यदेवांची मनोमन प्रार्थना करू लागली.तिच्या डोळ्यातून वाहणारा अश्रुंचा पुर कितीतरी वेळ तसाच वाहत होता.तिच्या या सावित्री साधनेला देव पावले व त्यांनी वा-याला पुन्हा जिवंत केले.यावेळी वा-याने मागच्या वेळी केलेली एकट्याने आक्रमण करण्याची चूक केली नाही.सोबत सुर्यदेवांना `बॅक अप’ ला ठेवून वा-याने पुन्हा ढगांवर जोरदार हल्ला केला.यावेळी ढगही पुर्ण थकलेले होते.त्यांनी आपले नेहेमीचे गि-हाईक असणारे नद्या,नाले,तलाव,शेतं,कालवे यांना डावलून आपले पुर्ण `द्रव्य’ एका टेकडीला आपलेसे करण्यासाठी खर्च केले होते(एका स्त्री पायी आपले सर्वस्व पणाला लावण्याचा छंद फक्त मानवालाच नाही तर..).सुर्यदेवांच्या साथीने आलेल्या व पुर्वीपेक्षा कितीतरी ताकतवर वाटणा-या वा-याच्या या रौद्ररुपाला पाहून पाहता पाहता ढगांनी तेथून धुम ठोकली.वा-याने विनंती केल्यावर सुर्यदेवांनी पावसाने चिंब भिजल्याने हुडहुडी भरलेल्या टेकडीच्या अंगावर उन पाडून आपले `रुम हिटर’ चालू केले.टेकडीचे अश्रुही वा-याला पाहून पार पळून गेले व ती सुर्यकिरणांच्या त्या मायेच्या उबदार छत्रछायेखाली अधिकच निहारून निघाली.हिरवागार शालू, उन्हाने आहेरात दिलेल्या सोनेरी रंगाच्या गळ्यातल्या माळा,नथ,कानातले झुमके,पायातले पैंजण,केसात ओवलेला रंगबिरंगी फुलांचा गजरा यामुळे सौंदर्याचा कडेलोट वाटणा-या त्या टेकडीला मग वा-याने सुर्यदेवांच्या साक्षीनेच मागणी घातली आणी अधिक वेळ न दवडता सुर्यदेवांनी त्या दोघांचा यथासांग लग्नसोहळा पार पाडला…..शुभमंगल सावधान……मी नकळत पुटपुटलो..

अबे नानकर…? बिल्डरने प्रोजेक्टसाठी जंगलतोड करून भुभाग रिकामा करावा व त्यातील काही झाडं फक्त (पुन्हा लावली तर मोठी व्हायला अनेक वर्षे लागतील हा व्यावहारीक विचार करून) शिल्लक ठेवावीत त्याप्रमाणे बरेचसे टक्कल पण काही भागात केस असणा-या डोक्याचा सारंग मधुसुदन भिडे नामक बालमित्राच्या हाकेने मी भानावर आलो.सारंग आज इतक्या वर्षांनी भेटत होता .त्याचा हसरा चेहेरा,(भिड्यांचा ट्रेडमार्क असणारे) घारे डोळे,अबधित ठेवलेली गोलाई पुन्हा पाहताना एक गोष्ट मात्र खटकली की कधीकाळी शुद्ध पांढ-या पालीसारखे असणारे भिडे आज वर्णाने ब-यापैकी देशस्थ वळणाला लागलेले होते.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home