Tuesday, May 5, 2015

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-३

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-३

`काका,मी कालच रात्री केक टाकलाय त्या घुशीसाठी..बघू या काय होते ते..’

सकाळ होण्याची मी जवळजवळ कशी बशी वाट पाहीली. पहाटेच लगबगीने खाली जाऊन मी केक टाकलेल्या दोन्ही तिन्ही जागा नीट पाहिल्या.केक नाहिशे झालेले होते. घुशींनी ते फस्त केले आहेत ह्या अत्यानंदाने मला स्वर्ग दोन बोट उरले..( आजवर लिहीताना अनेकदा स्वर्ग दोन बोटांवर आणला आहे..पुढील वेळेस थोड्या टाचा उंच करून रंभा,उर्वशी बघीन म्हणतो…) घुशींनी तो केक डिनर नंतरची स्वीट डिश म्हणून खाल्ला का नाश्त्यात तोंड गोड करायला इतकाच काय तो तपशिल बाकी होता.कधी एकदा तोंड वासून मेलेल्या त्या घुशींचे शव उचलून फेकतो असे मला झाले होते.त्या उत्साहात मी ऑफीसला ‘ मयताला जायचे आहे’ असा निरोपही दिला.त्यावर साहेबानेही मग `तेराव्याचे जेऊनच या म्हणावं’ असा प्रेमळ आग्रह केल्याचेही सोबत कानावर आले..पण मी निश्चयाला पेटलेलो होतो. साहेब गेला उडत हे (मनाशी) म्हणण्याइतके मला मूषक वधाने झपाटले होते.

दर दहा मिनीटाला मी पुर्ण आंगण फिरून येत होतो.मेलेल्या,तडफडणा-या घुशीला बघण्यासाठी माझे डोळे आसूसले होते.सुर्य आता डोक्यावर आला होता.नाश्त्यात नाही तर लंच ला तरी केक खातील ही भाबडी आशा मी ठेवून होतो. रात्री टाकलेल्या केकच्या जागाही मला पक्क्या ठाऊक होत्या.त्या ठिकाणी ते केक नाहीत यामुळे लवकरच काहीतरी गोड बातमी येईल ही मनोमन खात्री होती.`आपल्या मयताची वार्ता येण्याची इतक्या आतुरतेने कोणी वाट पाहत असेल तर हे घुशे…तुझ्या जगण्याला तरी काय अर्थ उरला आहे गं…’असे भावनात्मक आवाहनही तिला मनोमन मी केले...आणी काही वेळाने बातमी आली….. एक कुत्रं बाहेर मरून पडल्याचे कोणीतरी सांगितले.

कुत्रे हे कुठलेतरी विषारी पदार्थ खाल्यामुळे मेले असल्याची त्याच्या तोंडातून येणा-या फेसाकडे बघून चर्चा सुरू होती.चुकून कुत्र्याने तो केक अथवा `केका’वलेली ती घूस तर खाल्ली नसेल..? मी कुत्र्याच्या केकसदॄश्य गोड पदार्थांविषयीच्या आवडी निवडी तसेच त्याची मांजरीसोबत उंदीर खाण्याच्या भागिदारी कराराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण ह्या कुत्रा व मांजर महायुतीचा या श्वानाच्या महानिर्वाणाशी असणारा संबंध ब-याचश्या बघ्यांच्या आकलनापलिकडे गेल्याने मतदारांचा एक्झीट पोल लक्षात आला नाही. त्यातच ते कुत्रे आपलेच आहे का हे बघण्यासाठी एक जोडपे तेथे येऊन थांबल्याने प्रसंगावधान दाखवत मी तेथून काढता पाय घेतला. 

दरम्यान जोशीकाकूंनी तिंबून ठेवलेला कणकेचा गोळा हातोहात भरदिवसा गायब झाला व जणूकाही गळ्यातील हारातला मोती कोणी काढून न्यावा त्याप्रमाणे काकूंनी त्या कणकेच्या रिकाम्या पातेल्याकडे बघत हताश होऊन टाहो फोडला..लगेच सौ नी घीराचा हात काकूंच्या पाठीवर ठेवल्याने गहिवरून येऊन काकूंच्या त्या सुरांना आणखीनच `ताल’ आला आणी जोशींकडे काही वाईट बातमी घडली आहे असे समजून शेजारच्या घरातील राक्षसभुवनकरांपासून ते कोप-यावरच्या रत्नपारख्यांपर्यंत सगळे आत डोकावून गेले.`गोळ्यात गोळा कणकेचा गोळा…जोशीकाका आहेत अजून काकूंना आवरा’ असले उखाणे मला सुचायला लागले.हा प्रकार इकडे सुरू असतानाच नुकत्याच आणून टाकलेल्या किराणातील गव्हाच्या पोत्याला धार लागून गहू चालत चालत अंगणात गेल्याचे खळबळजनक वृत्त कुमारी श्रेयाने पोहोचवले व आम्ही धावत घरी गेलो.घरात अक्षरशः हैदोस माजला होता.पोत्यातील गव्हाने वेगळ्या चुलीकडे वाटचाल केलेली होती तर गाद्यांमधला कापूस अचानकच गादीचा पाठींबा काढून बंड करत युतीबाहेर पडला होता,देवघरातील तुपात भिजवलेल्या कापसाच्या वातींचा डब्बा पुर्ण उघडा होऊन `वात’ आल्यागत पडला होता.हे सगळे पाहिल्यावर सौ हंबरण्याच्याही पलीकडे जात फक्त तोंडाचा चंबू करून विस्फारीत नजरेने पाहत राहिल्या.`तुझे डोळे सुंदर आहेत त्यांच्याकडे बघत रहावेसे वाटते असे मी काही गाफील क्षणी तरूणपणी बोललोही असेल…पण आजचे सौ चे ते विस्फारलेले डोळे कुठल्याही भयपटात सहज ड्रॅक्युलिनीचा क्लोजअप म्हणून खपले असते.

गोष्ट आता हाताबाहेर गेली होती.घराच्या चार भिंतींच्या आत येऊन केलेला हा हैदोस कुठल्याही दरोड्यापेक्षा कमी नाही ही मनोमन मला जाणीव झाली.टाकलेला केक एकतर घुशींनी न खाता त्या मेलेल्या दुर्देवी कुत्र्यानी खाल्ला असणार असे वाटून मी पुन्हा जाऊन केक चे दोन पुडे घेऊन आलो.या वेळेस केक टाकताना तो अगदी बिळाच्या तोंडावर टाकला व कुत्रा वा मांजर जाऊ शकणार नाहीत अशा दगडांच्या कपारीत तो फसवला आणी आता सरहद्दीवर लढणा-या व मशिन गन ची नळी डागून ठेवलेल्या सैनीकासारखा एका कुंडीच्या आड लपून मी निरीक्षण करत बसलो.संध्याकाळ होईस्तोवर कुठलीही हालचाल झाली नाही.आजची टाकलेली सी ल पुर्ण वाया जाणार ह्या जाणीवेने मन विषीण्ण झाले.आता खरोखरच तेरा दिवस रजा टाकावी आणी घुशींना यमसदनी आणी गरज पडली तर मरणयातनांची परिसीमा म्हणजे यमाच्या श्वसुरसदनी धाडूनच ऑफीसला जावे असे वाटायला लागले. अचानक डोळ्यासमोर काजवे चमकले.मी नजर अजून तीक्ष्ण केली असता ते दोन बारीक डोळे माझ्याकडे रोखून बघत असल्याची खात्री झाली.मी नजरेची एकाग्रता कमालीची वाढविल्यावर मला हळू हळू घूस तो केक संपवित असल्याचा भास झाला.मनात हर्षाची लकेर उमटली..मी स्तब्ध राहिलो.हळू हळू तो केक फस्त झाला आणी मी जागच्या जागेवर उडीच मारली.

आज मला शांतपणे झोपायचे होते.उद्या ऑफसला मात्र जावे लागणार होते.त्यामुळे घुशीच्या अंत्यसंस्कारासाठी जोशी काकांकडे सुटी घेण्यासाठी शब्द टाकावा असे मनोमन वाटले.पण सौ नी जोशीकाका गावाला गेले असून घुशींसाठी मी एकटीच पुरेशी असल्याचा दावा केला आणी बाजीप्रभूंचा आत्मा पुन्हा एकदा कृतकृत्य झाला.

सकाळी सकाळी मी ऑफीसला जाण्याअगोदरच घुशी कुठे मरून पडल्या हे पाहण्याच्या उद्देशाने लगबगीत अंगणात उतरणार एवढ्यात घात झाला…मी पाय पायरीवर टाकला आणी का कोण जाणे ५० वर्षांपासून कधीही आपली `पायरी’ न सोडणा-या त्या मजबूत दगडी पायरीचा धीर खचला आणी तिने सीतामाईच्या जन्मभूमीत आपले बस्तान बसवले.अचानक झालेल्या या दग्याफटक्याचा अंदाज न आल्याने मग ७४ किलोच्या ह्या विस्तारीत देहाचाही बुरूज कोसळला. `धप्प’ असा आवाज आला ( खरंतर माझे वजन बघता तो धडाड…असा आवाज असणार..असो उगीच भलत्या विषयावर चर्चा नको..) कारण सौ आतून ओरडल्या `अगं बाई आता या घुशी गेल्या आणि माकडे आली वाटतं छतावर…’ आणी मग आपल्या समस्त मानवजातीच्या त्या पुर्वजाला आपल्या पिलावळांसकट मर्कटलीला करताना पाहण्याच्या अतिव इ्च्छेपोटी हातात पेस्ट व दुस-या हातात ब्रश घेऊन धावत बाहेर आलेली साक्षी हातातल्या पेस्टरुपी द्रोणागिरी सकट भुईसपाट झाली आणी मग तिने वेदनेने विव्हळत भोकाड पसरले.वेदनेच्या हिंदोळ्यांवर झुलत झुलत मी एक हात पार्श्वभागावर,एक कमरेवर व गुडघ्यावर ठेवायला निव्वळ हात शिल्लक न राहिल्याने लंगडत कसा बसा साक्षीला घेऊन घरात परत आलो. सर्वात आधी पायरी धसल्याची खबर घरात दिली.आणी पुढची संभाव्य पडझड थांबविली.

पुढील २४ तास हे निव्वळ शरीराच्या वेगवेगळ्या भागांना शेक देणे,मलम लावणे या उपचारात गेले.दरम्यान जोशी काकू आणी आमच्या सौ यांच्या द्विसदस्यीय समीतीने केलेल्या तपासान्वये कुठेही घूशीचे शव सापडल्याची तक्रार नोंद झालेली नव्हती. प्रचंड नैराश्य आले होते.एकतर या घुशींच्या नादात दोन दिवस फुकट रजा पडली आणी त्यातून काहीही निष्पन्न नाही.घुशीला केक रिचवताना मी स्वतः बघीतलेले असल्याने त्या केक चा काहीही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही हे उघड होते.थोडे बरे वाटायला लागल्यावर घुसच काय आख्खा माणूस यमसदनाला पाठविण्याची वल्गना करणा-या त्या दुकानदाररुपी रेड्याला रुग्वेदाचे चार श्लोक कानी पाडण्यासाठी तावातावाने मी गेलो असता तो स्वतः आपल्या दुकानाचे पेस्ट कंट्रोल करून घेत असल्याने दुकान ४ दिवस बंद असल्याची धक्कादायक बातमी मिळाली.

आता मात्र माझा संयम सुटत चालला होता.आणि दिवसागणीक घुशीचे प्रताप वाढत चालले होते.पाय-या,कंपाऊंड यावर समाधान न मानता आता तिने आमच्या घराच्या भिंतींखालून भुयारे खणायला सुरूवात केली होती.पायरी सरकल्यापासून माझ्या मनातील धास्ती फारच वाढली होती.मला उघड्या डोळ्यांनी माझे राहते घर भिंती धसल्यामुळे जमिनदोस्त होईल असे वाटायला लागले.ऑफीस मध्ये गेल्यावरही आपल्या मागे घरी काही घडणार तर नाही ना असे वाटत असे.त्या गडबडीत सौ बद्दलही प्रचंड काळजी दाखविली जाऊ लागली.`कशी आहेस…बरी आहेस ना?..’ या सामान्य विचारापूसवजा वाक्यांचा भलता अर्थ काढून, आमच्या हिने कुर्मगती कार्यशैलीमुळे विणकाम अर्धवट राहिलेले श्रेयाच्या वेळेचे स्वेटर पुन्हा विणायला बाहेर काढले.मला आधीच गळ्याशी आलेले घराचे बजेट अजूनच डोक्यावर जाताना दिसायला लागले आणी मग मात्र आता काहीतरी तातडीने करायला हवे ह्याची जाणीव झाली.

विषानंतर जालीम काय ही चौकशी सुरू झाली आणी मग सायनाईड या पदार्थाचे नाव समोर आले.त्याचा एक थेंब आख्ख्या माणसाला क्षणार्धात संपवितो अशी आख्यायिका मी ऐकून होतो.पण हे सायनाईड सगळीकडे मिळत नाही म्हणतात.त्यासाठी लाईसेन्स लागते असे ऐकले.दरम्यान जोशी काका एका औषधी कंपनीत कामाला असल्याने त्यांच्या कंपनीत सायनाईडचा वापर केला जातो हे मागे बोलल्याचे मला आठवत होते.मी `सायनाईड ची एक बाटली घेऊन या’ अशी गळ त्यांना घातली.झालेल्या दुखापतींच्या,गेलेल्या कणकेच्या गोळ्याच्या आणी गादीबाहेर आलेल्या त्या कापसाच्या आणा भाका त्यांना घातल्यावर तेही प्रयत्न करायला तयार झाले.पण नंतर दुस-याच दिवशी त्यांचे डिपार्टमेन्ट बदलल्यामुळे आमचा हाता तोंडाशी आलेला `सायनाईड’ चा घास नियतीने हिरावून नेला.

माझ्या डोक्यात दिवसरात्र फक्त त्या घुशींचा नायनाट एवढाच विचार येऊ लागाला..त्यामुळे ऑफीसच्या प्युन ने `साहेब,फाईल कुठे ठेवू?’ या प्रश्नाला `बिळात ठेव’ हे उत्तर..तसेच डिलीव्हरी साठी तगादा लावून डोकं खाणा-या गि-हाईकाला तो गेल्यावर अगदी `घुशी’ सारखा डोकं कुरतडून गेला हा शेरा…`या बॉस ला ना रॅट किलरच दिले पाहिजे’ हा मनाशी आलेला विचार,रस्त्याने जाता येता पुर्वी प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लक्ष आता त्याच स्थळांच्या काचेच्या बांगड्यांकडे जाऊ लागले आणि पराकोटी म्हणजे कॉम्प्युटर सोबत असणा-या माऊस ला हात लावताना चारदा विचलीत होणारे मन….आणि हिम्मत करून त्याला धरल्यावर मुंडी पिरगळल्यागत त्याचा होणारा वापर होय…

क्रमशः

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home