Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१४ (निरोपाचा भाग)

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१४ (निरोपाचा भाग)

विशेष सूचनाः

१.आज समारोपाचा भाग असल्याने कुठलीही सुचना नाही हे लक्षात घावे उगाचच दिवाळीच्या शुभेच्छा व इतर सुचना असलेले पान राहून गेल्याचा व्रात्य निरोप पाठवू नयेत.

आता पुढे..

दिवाळीचा भरगच्च फराळ रिचवून व एक शेवटची चकली तोंडात टाकत येणारा कुरूम कुरूम आवाजाने प्रोत्साहीत होऊन हा शेवटचा भाग लिहीण्यास घेत आहे.(बायकोच्या हातच्या वातड चकल्याही पाडव्याच्या दिवशी कुरुम कुरुम वाटून घ्यावेत हा एक अलिखीत नियम आहे व हीच तर आपली संस्कृती आहे नाही का?)

माझे भाषण झाल्यावर मग जणू स्टेजवर येण्या-यांमध्ये चढाओढ लागली.प्रथम अशिष जरिवाला जे मुद्दाम दुबईवरून या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यांनी सर्वांना पुढचा रियुनियनचा कार्यक्रम दुबईत घ्यावा असे आवाहन केले व त्याच बरोबर तो कार्यक्रम ते स्वतः प्रायोजीत (स्पॉन्सर) करतील अशी घोषणा त्यांनी केली.याला मात्र सर्वांनी अगदी मनःपुर्वक टाळ्या दिल्या.अनेकांनी बाहेरच्या देशात जायची चर्चा सुरू आहे हे लक्षात आल्यावर लगेच तेथूनच आपला पासपोर्ट काढायला घेण्याची सुचना आपल्या ट्रॅव्हल एजंट ला केली.दुबईत प्रसिद्ध असणा-या सोन्याच्या बाजारपेठेमुळे जर तेथे रियुनीयन झालीच तर ति ही ह्या वेळेसारखीच सर्व कुटूंबासाठी नसावी व तशी ठेवल्यास तेथील बाजारहाटीचे बिलही अशिषने स्पॉंन्सर करावे अशी कुजबूजही कानावर आली.माझ्या मनात मात्र निराळेच विचार चालू होते.मला औरंगाबादहून येताना स्वर्गरथात बसण्याचा आनंद देणा-या निलेशला वर विमानातूनच खाली ढकलण्याची स्वप्न मला उघड्या डोळ्यांनी पडायला लागली.त्यासोबतच वरून विमानातून दिसणा-या ढगरूपी कापसाला तोडून त्याच्याच वाती वाळून त्या घरी दिवाळीला पणतीत टाकायला कामी येतील अशीही एक विनोदी अतिशयोक्ती मनात आली.

मुन्शी राठींनी आपल्या खुमासदार किस्सा कथनामुळे (इतरांना आपाआपले) पोट धरून हसवले.मराठी ची त्यांनी केलेला संधीविग्रह `मर-राठी’ भरपूर टाळ्या देउन गेला.शाळेच्या त्या पोस्टर कडे बघून त्यांनी तो कचोरीवाला जेथे बसायचा त्या जागेकडे बोट दाखवत काही काल्पनीक कचो-या उभ्या उभ्याच मनातल्या मनात रिचवल्याचे त्यांची देहबोली सांगत होती.त्यांच्या शरीराचा मनोरा भाषण देतांना इतका जास्त झुकल्यासारखा वाटत होता की त्यामुळे पालीकेची जुन्या संभाव्य धोकादायक इमारतीची नोटीस लवकरच त्यांना डकवण्यात येईल असे वाटते.

त्यांच्या त्यानंतर आलेल्या शेखर सोळुंक्यांनी मोजक्या शब्दात त्यांना शाळेचे कुंपण मोठे,कुलूप लावलेले नसल्याने मधल्या सुट्टीत पळून जाण्याच्या सोयीमुळे शाळा कशी आवडत होती हे मोठया भक्तीभावाने सांगतानाच शाळेच्या अनेक गुरुवर्यांचा आदरपुर्वक उल्लेख केला.त्यांनी काढलेल्या `आमच्या वर्गातच मुली असल्याने वर्गात आचारसंहिता कायम असायची’ हे वाक्य मला स्वतःला ऐकताना खूप छान वाटले.जसे आचारसंहीतेच्या काळात मंत्र्यांच्या गाडीवरील दिवे काढून टाकण्याचा नियम आहे त्याप्रमाणे दहावी फ च्या विद्यार्थ्यांचे त्या काळात अभ्यासात (इतर काही तुकड्यांचा तुलनेत) दिवे का लागले नव्हते याचे कारण मला आत्ता समजले.(आचारसंहितेमुळे ते काढून टाकलेले होते.)

महेश फडणीसने त्याचे काका असणा-या फडणीस सरांच्या सलग ३६ वर्ष विदाऊट लिव्ह सर्वीस च्या रेकॉर्ड चा उल्लेख केला आणी खरोखरच आश्चर्य व कौतुक वाटले.आता नविन पिढीत कामावरील माणसांची महिन्यात एकही सुटी नसेल तर त्याला कामाची खुपच गरज आहे असे समजून मालक त्यांना हलक्या दर्जाची कामे सांगतात म्हणे.आणी त्यामुळे आजची पिढी महिन्यातून किमान ३ सुट्ट्या मारून आपली गरज मालकाला पटवून देतात हे समजते. गुरुवर्यांच्या कपड्यांवर आपण शाई शिंपडून त्यांना रंगवत होतो हे सांगताना महेश चे उर अभिमानाने भरुन आले होते.महेश अरगडेनेही त्याला प्रिया सुपारी खाल्ली म्हणून तोंडात तंबाखू पान ठेवून रागावणा-या सरांचा किस्सा सांगून आपला जुना राग `थुंकून’ टाकला.

रणजित देशमुखांनीही मित्रांच्या पार्श्वभागाखाली बसताना कर्कटक ठेवण्याची एक प्राचीन लोककला कशी लोप पावत चालली आहे या विषयी खेद व्यक्त केला.त्या कलाप्रकारामधल्या अपु-या सरावामुळे घडलेल्या एका अपघाताचेही त्याने उदाहरण दिले.त्या काळी आपण कसे नाटकं करत होते हे सांगतानाच त्याने महेन्द्र ठोंबरे सोबत एकाने दुस-याचे खांद्यावर चढून केलेल्या चेटकीणीच्या नृत्याचा उल्लेख केला.(त्यांच्या या चेटेकीणीला घाबरून शेवटी त्यांचे सहकारी बेंचमित्र आनंद साकळे लड्डाखला सैन्यात तर शरद कल्याणी अमेरिकेत पळून गेल्याचे त्यांच्याच भाषणातून समजले.) मधल्या सुट्टीत पळून जाण्याची विचीत्र वाटत असली तरी आवश्यक प्रतिभा आजच्या विद्यार्थाने टिकवून ठेवणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले.सरस्वती भुवन मध्ये एक सुरक्षीत वातावरणामुळे व इको सिस्टीम मुळे आज इथवर आल्याचे त्याने प्रांजळपणे कबूल केले.(त्याच इको सिस्टीमच्या सवयीमुळे दुस-याने आपल्याला हासडलेली शिवी दहा वेगवेगळ्या शिव्यांच्या माध्यमातून साभार परत करण्याचे प्राविण्य समस्त स.भु.बांधवांकडे आले आहे.)

योगेश भारतीयाने इंग्लीश कॉन्वेन्ट शाळेतून सरस्वती भुवन मध्ये आल्यावर झालेल्या हालापेष्ठांचे वर्णन केले.मराठीचा कुठलाही गंध नसताना तेथे आल्यावर शिकाव्या लागलेल्या `राजा स जी महाली सौख्ये कधी मिळाली’ सारख्या कवीतांमुळे मराठीत मिळालेल्या ९ मार्कांना सरांकडून ११ कश्या खुबीने करून घटक चाचणीत पासांतर केले याचेही वर्णन केले.त्यावेळी मी दहावीत मराठीतले मार्क्स कमी वाटून रिकाऊंटींग ला टाकलेल्या उत्तरपत्रींकांना बोर्डाचे छापील `गुणांमध्ये कुठलीही वाढ झाली नाही’ चे आलेले उत्तर आठवले.त्यातील पुर्ण मजकूर छापील पाहून माझी कुठलीही फेरतपासणी न करताच मला उत्तर पाठवण्यात आले आहे ही भावना अजूनही कधी कधी मनाला खट्टू करून जाते.त्यानंतर मी अभ्यास करूनही कमीच मार्क मिळणार असतील तर ते अभ्यास न करताच मिळवलेले काय वाईट असा एक `अभ्यासू’ विचार करून पुढे आरामात इंजिनियर झालो.

प्रफुल्ल बल्लाळांनी एका अतिशय वैशिष्ट्यपुर्ण शैलीत आपले आजच्या शाळांचे अनुभव सांगितले.त्या च्या मुलाच्या शाळेचे अनुभव सांगताना ` त्याची डायरी नाही वाचलीत का?’ ह्या मुलाच्या वर्गशिक्षीकेने प्रफुल्लला विचारलेल्या प्रश्नाला त्याने दिलेले `तो डायरी लिहीत नाही’ हे दिलेले उत्तर खुप टाळ्या देऊन गेले.

त्यानंतर मकरंद कुलकर्णींनी केलेले अतिशय वेधक पद्धतीचे विशीष्ट शैलीत केलेले भाषण मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेले.त्यांच्या वक्तृत्वात एक वेगळाच मिश्कीलपणा दिसला.त्यांनी आजही पाठ असणारे आर्किमिडीजचे तत्व ज्या वेळेस सांगितले ते ऐकताना मनात त्या काळात आर्किमिडीज,न्यूटन,पायथागोरस (या पायथागोरसपंतांचा जन्म गोरज मुहूर्तावर झाला आहे असा एक अतिशय साधारण विनोद करून मी त्या काळी `गोरस’ या त्याच्या आडनावावर कोटी करायचा केविलवाणा प्रयत्न करीत असे.थोडक्यात काय समोरचा हसो वा न हसो आपण आपले बाष्कळ विनोद जाहीरपणे मांडणे ही सवय जुनीच बरं का..’) यांचे शोध व त्यांनी ते आपल्यापुरते मर्यादीत न ठेवता समस्त जगातल्या पाठ्यपुस्तकात छापायचा केलेला आगाऊपणा याच्याविषयी असणारी प्रचंड मोठी खदखद मी टेबलावर रॅंप वॉक करणा-या एका डासाला माझ्या पंजाचा आघात करून बाहेर काढली.त्यावेळी आलेल्या धप्प अश्या आवाजाने आमच्या शेजारी बसलेल्या व छायाचित्रणात व्यग्र असणा-या सचिन काळेंचा कॅमेरा हलून त्यांचे लक्ष १० वी ड च्या खिडकी बाहेर शारदा मंदीर कडे बघताना व्हावे त्याप्रमाणे विचलीत झाले.संसदेमध्ये बेंच बडवून प्रशंसा व्यक्त करायची पद्दत कशी सुरू झाली याचा उगम अशाच डास,माश्या आदीक मंडळींच्या उच्छादात आहे हे सहज लक्षात येईल.(अर्थात माश्यांच्या संख्येपेक्षाही त्या मारणा-यांची संख्या वाढल्याने मग कालांतराने एकेमेकांना बडवायचा आधुनिक बदल आपल्या राजकारण्यांनी केला तो भाग प्रशंसनिय आहे.)

त्यानंतर पराग केंद्रेकर,प्राची रत्नपारखी,स्वाती बुग्धे,आनंद कुलकर्णी व इतर काहींनी आपआपले विचार मांडले.मधेच हर्षल ने आमच्या नावाचा उल्लेख करत `याला नुसतेच मुलांचेच नाही तर त्यांच्या वडीलांच्या नावासकट पुर्ण नावे पाठ आहेत अशी जाहीर घोषणा केली.मग खास लोकाग्रहास्तव आम्ही पुन्हा स्टेजवर गेलो.मग तेथे आमची एक तोंडी परिक्षा घेण्यात आली.त्या परिक्षेत आम्ही पहिल्या नंबरात उत्तीर्ण होऊन १० वी ड ची `एकही मेरीट मधे न येण्याची’ उणीव भरून काढली.

बाकीचे काही भाषणे चालू असतानाच मला काही अपरिहार्य कारणामुळे औरंगाबादेस वापस कूच करण्याचा एसएमएस खलिता मोबाईल यंत्राद्वारे आला होता.त्यानुसार आम्ही परतीच्या प्रवासासाठी शिदोरी व घोडा (वाहन) याचा बंदोबस्त करण्याचा मनसुबा रचून पुन्हा स्वर्गरथाचे सारथी निलेश यांना शब्द टाकला.तेही एका पायावर (त्यांना दोनच पाय आहेत हा एक विलक्षण गौप्यस्फोट या निमीत्ताने करत आहे)तयार झाले.आमची ही चाललेली कुजबूज शेजारणीने सासू सुनेचे चाललेली धुसफूस दाराला कान लावून ऐकावी व परस्पर २०० मैल लांब त्यांच्या आत्येसासूला कळवावी त्याप्रमाणे मकरंद ने ती सगळी कडे जाहीर केली.दरम्यान त्यानेही सोबत येण्याचा त्याचा छुपा मनसुबा जाहीरपणे सांगितला.मग आम्ही तिघांनी आमचा हा बेत येताना आमच्या सोबत निघालेल्या अजय काळेला कळवला.त्याने आमचे मन वळवायचा बराच प्रयत्न केला पण मला सकाळपर्यंत तेथे पोहोचणे गरजेचे असल्याने मी तो साभार नाकारला.अजय च्या आग्रहाला मकरंद जवळजवळ बधला होता पण रात्री लोणावळ्यात थांबून त्याला शुद्धीतली सोबत न मिळण्याच्या भितीने त्याने अखेर साश्रुनयनांनी अजय ला नकार दिला व आमच्या सोबत येण्याची तयारी सुरू केली.

दरम्यान आमचा बेत ब-याच जणांना समजला होता पण मला जाणे आवश्यक असल्याने शेवटी मग वळे,मिरजकर,रायबागकर,अजय काळे,कुलूवाल,मिहीर,चुडीवाल आम्हाला पोहोचवायला गाडीपर्यंत आले.पण का कोण जाणे काहीतरी सारखं राहिलय असे वाटत होते.चारदा खिसे चाचपडून पाहीले (स्वतःचे).मग नंतर वाटलं कॅमेरा बॅग मधे टाकायचा राहीला.म्हणून शेवटी पुन्हा एकदा बॅग तपासली.कॅमेरा जागेवरच होता.तरी पाय निघत नव्हता.मग आत रूम मध्ये गेल्यावर काही राहिलेले दिसेल म्हणून पुन्हा रुम मध्ये गेलो.मग मनात एक खिन्न भाव येण्यास सुरुवात झाली.कोणी मोठमोठ्याने हसत होतं,कोणी टाळ्या देत होतं,कोणी एखाद्याला त्याच्या जुन्या आठवणी काढून चिडवत होतं …मग लक्षात आलं की गेल्या तीन दिवसांपासून रियुनियनच्या निमीत्ताने तयार झालेले हे वातावरण मन मागे सोडायला तयार नव्हते.` ये दिल मॉंगे मोर’ या जाहिरातीला मी पुर्वी हसत असे व म्हणायचो `असे `मोर’ खाणारे मॉंसाहारी दिल नको,मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.’ पण कदाचित मला माझ्याच त्या वेळेस मारलेल्या त्या पाचकळ विनोदाबद्दल स्वतःची कीव आज वाटत होती. आज खरंच `दिल मॉंगे मोर’ चा अर्थ जाणवत होता.आणी अशीच एक रियुनियन पुन्हा लवकरच करू हे एकमेकांना वचन देत मी पुन्हा एकदा कार पर्यंत आलो. दुरवर विनायक,मुन्शी,मिहीर उभे होते.त्याला ओरडून सांगावेसे वाटले `अबे विन्या,सिगरेट काढ ना यार..ओढ पुन्हा,आता जातोय मी..एकदा बघून घेऊ दे…तुझी धुराची नळकांडी..’ अरे मुन्शी,मिहीर यार खूप विनोद केले यार तुमच्या या हेवीवेट शरीरावर..पण राग नाही आला ना तुम्हाला..?’ सुहास वळे ने आम्ही निघताना ` सांभाळून जा रे…’ हे निलेश कार चालू करत असताना सांगितले. मी निलेशच्या त्याच स्वर्गरथात बसून सुद्धा आता तो कार खूपच व्यवस्थीत चालवेल असे उगचच खात्री वाटली.कार चालू झाली,रिसोर्ट च्या गेट पर्यंत येतांना अनेकांना दुरून हात हलवत अलविदा केले. आणी माझ्या गळ्यातला आवंढा नकळत गिळला गेला.

आभारप्रदर्शनः
मित्रांनो,अशा प्रकारे आमचे हे लोणावळा कथानक आम्ही मजल दरमजल करीत १४ भागांच्या तपश्चर्येनंतर पुर्ण करत आहोत.यानंतर झालेले रात्री च्या डी.जे. चा वृतांत प्रयत्नपुर्वक लिहून पुर्ण करण्याचा विडा आनंदराव वा मनिषरावांनी अथवा इतरही कोणी उचलावा ही मनापासूनची इच्छा.मला खात्री आहे की भाग १ ते भाग १४ पर्यंत बराचसा मजकूर आपण वाचला असेल (व आपल्याला समजला असेल)..यापुर्वी नमूद केल्याप्रमाणे जेव्हा पहिला भाग लिहीला तेव्हा तो विनोदी असावा असे ठरवलेले नव्हते.मात्र लिखाण जसे चालू केले तसे ते थोडे विनोदी अंगाने जात आहे हे लक्षात आल्यावर मात्र त्यानंतरच्या भागात ते प्रयत्नपुर्वक थोडे विनोदी ठेवले आहे.कधी कधी हा प्रयत्न अपुरा पडला कधी तो काही वाचकांना पचला नाही.एका भागात काही शारिरीक व्यंगावरील टिकात्मक विनोदाचा अतिरेक झाल्याची अतिशय तिखट प्रतिक्रिया काही वाचकांकडून आली आहे.याबद्द्ल मी आपल्या सगळ्यांची मनःपुर्वक माफी मागतो.येथे कोणालाही दुखावणे हा उद्देश नव्हता.उलटपक्षी दुर गेलेले आपल्या सर्वांसारखे हे पक्षी पुन्हा एकाच घरट्यात परत येण्याच्या या सोहळ्याला मिश्कील धाटणीत साहित्यरुपाने संग्रहीत करणे व रोजच्या धकाधकीत दमलेल्या तुमच्या आमच्या मनाला काहीतरी हलकेफुलके वाचायला देऊन एकेमेकांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करणे हा होता.
आपल्यापैकी बहुतांश वाचकांचा अभूतपुर्व मिळालेला प्रतिसाद,वेळोवेळी आपण केलेल्या सुचना,दिलेल्या प्रतिक्रिया यामुळे सतत हे लेखन करण्याची प्रेरणा मिळत गेली.दर शुक्रवारी एक भाग लिहायचाच असा कधी नाही इतका शिस्तीत निर्धार ब-याच अंशी पाळू शकलो यात अतिव समाधान मिळाले.प्रत्येक भाग लिहीताना मला आमचे परम मित्र उपेन्द्र नागापूरकर व मकरंद सातारकर यांची आठवण येत राहीली आहे कारण लहानपणापासून कॉलेज संपेस्तोवर जसा वेळ मिळेल तसा एखाद्या कट्ट्यावर यातील ब-याचश्या विनोदांच्या रंगांची उढळण आम्ही एकेमेकांवर करत आलेलो आहे व त्याचा विनोदबुद्धी अधिक बळकट होण्यास निश्चीतच उपयोग झाला आहे.

शेवटी जाता जाता माझ्यासारख्या नवख्या लेखकाला सांभाळून घेतलेत त्याबद्द्ल आपले सर्वांचे आभार, मनिष पाडळकर,सारंग भिडे,शैलेश पत्की,आनंद देशमुख,अमित कुलकर्णी,संभाजी अतकरे या सर्वांचे असा कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल आभार व सरतेशेवटी ज्या शाळेने रचलेल्या पायावर आम्ही आज खंबीरपणे उभे आहोत त्या शाळेच्या शिक्षकांपासून ते शिपायांपर्यंत सगळ्यांचे आभार.

समाप्त.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home