Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -११

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -११

विशेष सूचनाः

१.मागील शुक्रवारी वेळेआभावी भाग-११ लिहून न झाल्याने फेसबुक प्रकाशन करता आले नाही त्यावर `नानकर विसरलात का भाग-११?’ ,`शुक्रवार च्या फर्स्ट डे फर्स्ट शो ची सवय तुम्ही पुन्हा लावली आहे तरी त्यात खंड पाडू नये’ तर सगळ्यात परीसिमा म्हणजे फक्त `हाउ डेअर यू’ हा आलेला मेसेज यावरून प्रस्तुत लेखकाचे लिखाण काहीजण नियमाने वाचत असल्याची शंका येत आहे व त्याचा मनोमन आनंदही होत आहे.

२. हा भाग लिहीतांना काही गोष्टी आठविण्यासाठी मनिष पाडळकरांची मोलाची मदत कवडीमोल किमतीत घेतली आहे तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत.त्यांच्या या उपकारांची परतफेड त्यांच्याच घरी सहकुटूंब दिवाळीच्या फराळाला जाऊन केली जाणार आहे.(तरी प्रस्तुत लेखकासाठी कुरकुरीत चकल्यांचा एक डबाभर बंदोबस्त आजच करण्याची वहिनींना विनंती..व घरी चकल्या वेगळ्या बांधून घेऊन जाण्यासाठी रिकामा डबा आपल्या विनंतीस मान देऊन आमच्याकडून आणण्यात येईल काळजी करू नये.तोवर आमच्या वाढत चाललेल्या मुलांचे लहान होत चाललेले कपडे बोहरणीकडे देण्याची सोय करत आहोत.)

आता पुढे…

एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागलेले होते.त्यांच्या ओरडण्याने जाग येऊन मग ते ज्यांच्या पाठीवर बसले होते त्या पोटातल्या गायी,म्हशींनीही हंबरायला सुरुवात केली.अगदी या योग्य वेळेस भिडयांनी आग्रहाने जेवणाचे आमंत्रण दिले.`जेवायचे वाढून ठेवले आहे लवकर गिळा’ अशा रोकठोक शब्दांची रोजची सवय असलेल्या आम्हाला इतक्या अदबीने कुठल्याच गोष्टीसाठी कोणीही बोलवत नसल्याने प्रथम हे बोलवणे दुस-याच कोणासाठी आहे असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले होते.पण या वेळेस भिडे `आता आला नाहीत तर जेवणाची वेळ संपेल’ असे गुरगुरल्यामुळे अखेर आम्ही भोजनकक्षाकडे प्रस्थान केले.आत गेल्यावर त्या भोजनकक्षात असलेल्या निटनेटके पणाचा आस्वाद घेतला.सगळ्या बाजूनी असलेल्या रूंद प्रशस्त खिडक्यांकडे पाहताना यावर जर कमानीला शिवकालीन नक्षीकाम केले तर नुसता शायिस्तेखानच नाही तर सोबत अफजलखान व दिलेरखान यांनाही आपाआपल्या बेगमांना घेऊन शिवाजी महाराजांना घाबरून लाल महलाच्या बाहेर सोबतच उडी टाकता येईल एवढी मोठी ही खिडकी आहे असा विचार मनात आला. त्या खिडक्यांचे सरकावून वर केलेले पांढरे पडदे मला पावसाळ्यात आपण दोन्ही हाताने पॅंटला वर करत पाण्यातून चालत गेल्यासारखे वाटले.या कक्षातील दिवे मात्र प्रखर लागलेले होते.सुंदर आयव्हरी व चॉकलेटी रंगांनी भिंती व लाकडी टेबल खुर्च्यांची घातलेली ती रंगसंगत नजरेला पंचतारांकीत सुख देत होती. दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका भिंतीवर धुम्रपान बंदी चा फलक लावलेला होता.विनायक व इतर काही साथिदारांसाठी असले फलक म्हणजे तडीपारीचे आदेशच होते.यासोबत जर मद्यपान बंदीचेही फलक असते तर मात्र `हे जरा अतिच झाले’ असे भाव चेहे-यावर आणून, तडीपार गुंड जसे राजरोस पुढा-यांच्या पार्ट्यांना हजर राहून फोटो काढून घेतात तसे, अनेक होतकरूंनी त्याच फलकाखाली भरलेल्या ग्लासेस चा चिअर्स करून फोटो फेसबुक वर टाकले असते यात शंका नाही.

भुकेने प्रक्षुब्ध झालेल्या नजरेने मी सुरुवात कुठून करावी याकडे लक्ष केंद्रीत केले.ताटाचा उगम शोधणे हे मुंग्यांची रांग कोठे संपली हे शोधण्याइतकेच कठीण आहे.ब-याचदा या ताटांच्या आजूबाजूला भरगच्च ताटं हातात घेऊन गप्पा मारण्यात लोक इतके गुंग होतात की `एक्सक्यूज मी’ वगैरे शब्दांची आंग्ल प्रतिभा कमी पडते.अशा वेळेस मला माणसाला आता वाहनासोबत स्वतःलाही एखादा हॉर्न बसवता आला तर किती बरे होईल असे सारखे वाटत आले आहे.ब-याचदा वाटते की अशा वेळेस एक दोन दा सांगून जर तो ताटधारी बाजूला झाला नाही तर सरळ सगळे शिष्टाचार बाजूला ठेवून सरळ त्याच्याच ताटातले खायला सुरूवात करावी.व जर यदाकदाचीत ती `ताटधारीण’ असेल तर एखादा घास तिला भरवायलाही हरकत नाही.असो..तर एकदाचे मी ताट मिळवले.ते मिळवल्याचा आनंद पुर्ण उपभोगायच्या आधीच तिथे सुप ही होते हे आमच्या आधी सुप पित `सुपी’क होत आलेल्या काही मित्रांकडे पाहून समजले. मग हातावर पेपर नॅपकीन,त्यावर ताट त्यावर सुपाची वाटी त्यात सुप व सुप पिण्याचा चमचा अशी लगोरी रचत मी सुप प्राशन केले.जसे `थुंकता येत नसेल तर पान वाईट’ असे पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे `फुर्र..’ असा आदरणीय आवाज काढता येत नसेल तर सुप पिणे वाईट असे मी म्हणेल.पुन्हा सगळे शिष्टाचार बाजूला ठेवत एरवी अतिशय शिस्तबद्ध असणारे माझे वागणे बदलत मी शक्य तेवढा मोठा फुर्र.. आवाज काढत व वरून तृप्तीची परिसीमा वाटणारा `हा..’ असा मोठा आवाज काढत सुपाचा आनंद घेतला.त्यावेळी `पुअर एटिकेट्स’ असे भाव आणून माझ्याकडे पाहणारे कमी नव्हते हे सांगायला नको.

आता एकदाचे मुळ जेवण्याकडे सरसावलो.आता या बुफे पद्धतीत दोन प्रकारचे लोक दिसतात.एक म्हणजे मोजकेच वाढून घेऊन नंतर जसे लागेल तसे घेणारे व दुसरे म्हणजे सगळे आधी ताटात एकदाच वाढून घेणारे.आता या पहिल्या प्रकारात परत परत उठून येणे,पुन्हा रांग लावणे,पुन्हा कसेबसे हवे ते पदरात पाडणे ,ब-याचदा हवे ते संपलेले असल्याने मग तोंडाची चव गेल्यागत वापस येणे,किंवा अगदी मिळालेच तर मग उश्टे हात व दुस-या हातात ताट अशी सर्कस करत पुन्हा आपल्या जागेवर येणे,आल्यावर आपल्या जागेवर दुस-यानेच हक्क दाखवला असल्याचा साक्षात्कार होणे ही कसरत आहे. तो करण्याइतका वेळ पोटाकडे नसल्याने मग मी दुसरा सर्वमान्य प्रकार निवडला व जे दिसेल ते ताटात टाकत सुटलो.त्यात वाट्या,चमचा,काटे,सलाड,लिंबू,रोटी,भात,डाळ,भेंडी मसाला,पणीर व इतरही अनेक गोष्टी.काही क्षणातच भातावर टाकलेल्या डाळीने भाताचे धरण फोडून शेजारच्या पुरीसारख्या आकाराच्या रोटयांना `पुर’ग्रस्त करून टाकले.त्यामुळे घाबरून दोन्ही भाज्या एकेमेकींना घट्ट बिलगून बसल्या.पिळण्यासाठी तीन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या लिंबूने टुणकन उडी मारली व मी एखाद्या निष्णात राजकारण्याप्रमाणे घडलेला प्रकार दाबण्यासाठी स्वतःच्या बुटांचा वापर केला .`सलाड’ ने प्रथम खातांना आपलाच नंबर लागेल या भितीने वाटीखाली स्वतःला पुरून घेतले.दोन्ही वाट्या जागेची खूप अडचण झाल्याने एकमेकींना ढकलू लागल्या.ताटाबाहेर उडी मारून सुटका करू पाहणा-या काटे व चमचे या दोन सख्ख्या भावांना मी वेळीच आत ओढले.शांत,विचारी व संयमी चमचा चुपचाप एका वाटीत जाऊन बसला.पण क्रूर,शिघ्रकोपी व मांसाहारी काटा मात्र एका कोप-यात दबा धरून बसला.त्याला आवडणारे खाद्य शेवटच्या दोन टेबलांवर होते.मी जसा त्या टेबलांकडे सरकलो तसा तो काटा अधिकच सावध होऊन बसला.मला शुद्ध शाकाहारी समजणा-या काही मित्रांना मी शेवटच्या टेबलावरील मांसाहारी तंदूर चिकन नामक लाल वर्तुळांकीत पदार्थ ताटात टाकलेला पाहून आश्चर्याचा धक्का बसला.पण हा सगळा खटाटोप मी निव्वळ ताटात घेतलेल्या काट्याच्या मनाचा विचार करून केला हे मी मुद्दाम नमूद करतो.त्यावेळी तंदुराशेजारीच असलेला मटन मसाला माझ्याकडे तुच्छतेने बघत `तुम्ही काय राव तंदूरच्या पुढे सरकणारच नाही’ असे पुटपुटल्यासारखा वाटला.पण मागे एकदा अशाच एका लाल तांबड्या रस्स्याच्या आवाहनाला बळी पडून मोठ्या शौर्याने चावलेल्या एका मांसाहारी पदार्थामध्ये असलेला तिखट रस्सा चांगलाच झोंबल्याचे दुस-या दिवशी भल्या पहाटेच लक्षात आल्याचे चांगले स्मरणात असल्याने तसला काही पराक्रम बाहेरगावी आल्यावर न करायचे मी पक्के ठरवलेले होते.

हा सगळा ऐवज घेऊन मी एका लांबलचक टेबलावर येऊन बसलो (म्हणजे टेबलासमोरील खुर्चीवर).हळू हळू अविष्कार शेळके,सुनिल खिरड,निलेश,सचिन निसाळ,टाकळकर,दुधे असे अनेक मित्र पंगतीला आले.काही वेळाने सर्व डॉक्टरमंडळी,वळे,डोरले व काय आश्चर्य रोहीत विनय शहापुरकर यांचे आगमन झाले. रोहित ला मी बरोबर २१ वर्षांनी पाहत होतो.पुर्वीचे त्याचे ते नाजूक,हसरे,गोंडस व तेजस्वी रूप जसेच्या तसे मनात होते.चेहे-यावरील हास्य तसेच कायम होते पण रंग थोडा मावळलेला होता.ओठांवर असलेली काळपट छटा धुम्रपानबंदीच्या ठिकाणी तडीपारीचे आदेश त्याच्या नावचेही निघत असावेत हे स्पष्ट करणा-या होत्या.पुर्वीच्या त्याच्या कपाळावर सांडणा-या कुरळ्या केसांच्या बटा आता नाहिश्या झालेल्या होत्या.त्या कुठे गेल्या हे पहात पहात थेट मस्तकाच्या अर्ध्या वाटेवर मला काळे केस हुतूतू खेळताना भेटले.तोवरचा सर्व पृष्ठभाग केसांनी कपाळाला दानधर्मात दिलेला होता.गालावरील लांबवर ठेवलेले कल्ले मला सुजितकुमार वा रणजीत या खलनायकांची आठवण करवून गेले.मला रोहित ओळखेल असे का कोण जाणे मला वाटले होते.त्या विचारात मोठ्या आनंदात मी त्याला `हाय रोहित’ असे केले असता त्याने अत्यंत भुतदयेने एखाद्या नामांकीत नटाने सही मागणा-या आपल्या चाहत्याकडे बघावे त्या प्रमाणे पाहीले.त्याचा पुर्ण चेहेरा,डोळे,कान,नाक,उडालेले व राहिलेले केस माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.त्याने मला ओळखले नाही या भयाण वास्तवाला पचवत मी ` अरे मी नानकर,प्रशांत नानकर’ असे थेट `माय नेम ईज बॉंड,जेम्स बॉंड’ या धरतीवर बोललो.मग त्याचे डोळे,भुवया,नाक,कान,तोंड (व आतील दात,जीभ असले ऐवज) व उडालेले व राहिलेले केस एकदम उभे राहीले व त्याने `नानक्या……’ या माझ्या त्या काळातील अपभ्रंशी नावाने प्राणांतीक आरोळी मारली.ती अनेकांनी ऐकल्यावर मी अजून जिवंत आहे हे पाहून अनेक चाहत्यांना(?) हायसे वाटले (असावे).ही आरोळी मारतांना रोहितच्या चेहे-यावरील आनंदामुळे जरी त्याने मला चेहे-याने ओळखले नसले तरी मी त्याच्या आठवणीत होतो हे उघड होते. `नानक्या’ हे अपभ्रंशी नाव त्या काळात प्रत्येकाच्या इतके तोंडी होते की तेव्हा एका शाळेत नवीन आलेल्या मित्राने थोडेसे बिचकतच मला `तेरे डोके के केस का सरदारजी जैसा बुचडा कायकू नही है’ हा मौलीक राष्ट्रभाषेतील प्रश्न अतिशय निष्पाप मनाने विचारला होता.शिख धर्मगुरू गुरू नानक व माझ्या नावातील साम्यामुळे त्याचा घोळ झाला असावा.माझ्या हातात `कडे’ आहे का हे त्यानंतर ही तो कित्येक दिवस खातरजमा करून घेत होता.तो स्वतः मराठी असूनही माझ्याशी हिंदी का बोलत असे हे मला त्यानंतर समजले.

त्याचवेळी सुहास वळेही आत आले (नावावर जाउ नका हा शुद्ध मुलगा आहे).आता सुहास माझ्यासोबत अभियांत्रिकीलाही असल्याने त्याने मला न ओळ्खायचा प्रश्नच नाही असा एक फाजील आत्मविश्वासपुर्वक केलेला विचार मी `हाय वळ्या…’ असे म्हटल्यावर त्याच्या चेहे-यावरील एक दोन सोडून एका पाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नचिन्हांनी मावळला.मग अनेक हातवारे,ओळखी,आणा भाका घालून शेवटी वळेंनी आम्हाला ओळखले हे मान्य केले.(तेही बहूदा थोडा वेळ वाचावा म्हणून केलेले नाटक असावे.किंबहुना त्याला मी कोण हे अजूनही आठवलेले नाही असे मला उगीचच वाटत आहे. आणी खरेच तसे असल्यास त्याला मधला काळातला स्मृतीभ्रंश होण्याची व्याधी असल्याच्या निष्कर्षावर मी उडी टाकल्याचा `धप्प’ असा आवाज तुम्हाला एव्हाना आला असेल.)

दरम्यान जेवणाच्या टेबलावर पंक्तीला आनंदराव व इतर मंडळी पुन्हा लाभली होती.आनंद ला खूप भूक लागल्याचे (साहजिकच आहे हो बिचारा गेल्या तीन तासापासून उपाशी होता ) गच्च भरून आणलेल्या थाळीवरून जाणवत होते.त्याची रोटी संपल्यावर त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत व काही मित्रांकडून बसल्याजागी रोटीची घरपोच सेवा मिळावली.आम्ही मात्र आदर्श शिक्षकासारखा मेहेनतीने आपला क्रमांक कधी येईल याची वाट पाहत रांगेत रोटीसाठी उभे राहिलो.परत आलो तोवर माझ्या जागेवर दुसरेच कोणी बसले होते मग मी दुस-या एका तंदुर साठी उठलेल्या मित्राचे आसन बळकावत हातातल्या काट्याने माझ्या ताटलीतील तंदूरचा गळा कापला.

समोरच्या टेबलावर इंद्रजीत थोरात मटन मसाल्याने भरलेली वाटी व इतर ऐवज घेऊन विराजमान झाले.त्यांच्यात दहा दहा मिनीटात पोट भरत ठेवण्याचे `आनंदी’ कसब नसल्याने त्यांनी प्रचंड भूक लागल्यावर जसा माणूस तल्लीनतेने खातो त्याप्रमाणे आपला आहार चालू केला.

तिकडे दुरवर एका कोप-यात दहावी फ मधील अनेक मित्रमंडळींनी आपली वेगळी ओळख सकाळच्या जेवणातच `रंगीत पाणी’ रिचवत दाखविली. दरम्यान आमचे भोजन संपवून आम्ही पुढील गरम जिलबी व गुलाब जाम व थंड आईस्क्रीम या माझ्या अत्यंत आवडत्या स्वाद संगती कडे घोंगावलो.उंच आयस्क्रीम कपाकडे पाहताना मला नेहेमीच डोक्यावर खूप मोठी पृथ्वी घेऊन नेहेमीची खाली वाकलेली पोज देउन कंटाळलेला हर्क्युलस उठून उभा राहिला आहे असा भास होतो.त्याच्या डोक्यावरच्या त्या आयस्क्रीम व गरम गुलाबजामाचे अजब पण रूचकर मिश्रण खाताना मला अपार आनंद मिळून एकंदरीत लोणावळ्याची सफर सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले.पुन्हा पुन्हा त्याच टेबलावर जाण्याचा मोह माझ्यातले शिष्टाचारी व्यक्तीमत्व टाळत असतानाच तिकडे आनंदरवांनी राजू वैष्णव यांना मोठ्या मोठ्याने आवाज देऊन `दोन दोन एकदम आण’ असे जाहीर सभेत नितीन गडक-यांनी `सत्तेवर आल्यास पंधरा सिलेंडर’ची घोषणा केल्यागत मोठ्याने सगळयांना ऐकू जाईल अशा खड्या आवाजात सांगितल्याने मग हिम्मत करून मीही वैष्णवच्याच आडोशाला उभे राहून पुन्हा दोन गोळे कपमध्ये टाकत माझा मार्ग सुकर करून घेतला.दरम्यान `दोन दोन एकदम आण’ हे वैष्णवच्या प्रत्येक हातासाठी दिलेले बीजगणीत होते हे त्याच्या लक्षात न आल्याने तो बिचारा आपले `दोन्ही हातात दोन दोन’ असे जवळपास पाठ करत पुन्हा माझ्यासोबत उभा होता.

ब-याच वेळेपासून एक मोबाईल फोन माझ्या थाळीशेजारी पडून होता व माझ्या प्रत्येक घासागणीक तो काहीतरी निषेध केल्यागत गोल गोल फिरत होता.नीट लक्ष दिल्यावर तो मोबाईल व्हायब्रेटर मोड मध्ये वाजत आहे हा साक्षात्कार झाला.इकडे तिकडे पाहिले असता कोणीही त्याला कोणीही `वाली’ काय `सुग्रीवही’ नसल्याचे जाणवले.मग उत्कंठेपोटी मी नंबर वाचला असता `सुनिल खिरड’ चा फोन येत असल्याचे छापून आले.मी लगेच फोन उचलला असता पलीकडून खिरड `गधड्या इतका वेळ काय व्हायब्रेटर ब्रश म्हणून फोन वापरलास काय’ या थाटात .. `हॅलो…कोण बोलतय..?’ असे खेकसले.`मी नानकर बोलतोय’ सांगितल्यावर (माझ्या निरुपद्रवीपणाची खात्री असल्याने) खूप हायसे वाटून त्याने हा फोन सचिन निसाळचा असून फोन तुझ्याकडेच ठेव ,सचिन घ्यायला येतोय हा आदेश दिला.मी जर त्याला मी अमूक बिल्डर,तमूक डॉक्टर,फलाना वकील बोलतोय असे सांगीतले असते तर त्याने नक्कीच `चोर,चोर,चोर’ असा गलका केला असता याची मला खात्री आहे.थोड्या वेळातच गळ्यातल्या जाड सोन्याच्या चेन वरून ओघळणारा घाम पुसत सचिन निसाळ आला व `देवमाणूस देवळात आला’ या कृतज्ञतेने माझ्यापासून मोबाईल घेउन गेला.`चेन असेल तरच चैन हरपते’ हे एक क्रांतीकारी वाक्य मी माझ्या मनात जुळवले.

जाता जाता…
विनोद कशाशी खातात हे ही ठाऊक नव्हते अशा उभ्या भारतातील असंख्य नागरिकांना ज्यांनी आपल्याच समाजव्यवस्थेवर व परिस्थीतीवर हसायला शिकवले त्या जसपाल भट्टींच्या निधनाची दुःखद वार्ता या भागाचे लेखन चालू असतानाच मिळाली आहे.ज्यांच्या विनोदाची पातळी कधी गाठता आली तर खरा विनोद जमला असे म्हणावे असे हे बोटावर मोजता येतील इतक्या कमी व्यक्तीमत्वांमधील एक.त्यांच्या स्मृतीला आमचा आदरणीय प्रणाम..

क्रमशः लवकरच….

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home