Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१२

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१२

विशेष सूचनाः

१.पाहता पाहता या भागांची मालीका १२ भागांपर्यंत मोठ्या हिमतीने पोहोचली आहे.(यावर ` खेचून पोहोचवली आहे’ म्हणा या प्रतिक्रिया आताच आल्यासारख्या वाटत आहेत.) शेवटचा व चौदावा भाग दिवाळीत लिहीण्याचा मानस आहे व ते झाल्यावर या लिखाणाचा वनवास संपेल.वनवास एवढ्यासाठी की रामाला चौदा वर्ष बाहेर पडल्यावर त्याच्यासाठी काय काय वाढून ठेवले आहे हे कदाचीत इश्वरी अंशामुळे जाणीव असेलही पण प्रस्तुत पामर लेखकाला मुळातच हे चौदा भाग होणार आहेत हेच माहीती नव्हते व त्यावर प्रत्येक भागात विनोदी चव ठेवायची आहे याचे नियोजन आधी नव्हते त्यामुळे रामाच्या वनवासातल्या खडतर हालापेष्टांसारख्याच हाल अपेष्ठा अपु-या प्रतिभेमुळे,वेळेमुळे व शब्दभांडारामुळे विनोद निर्माण करताना भोगाव्या लागल्या आहेत.( व पर्यायाने आपणासारख्या वाचकांनाही भोगाव्या लागल्या आहेत).

आता पुढे…

हाती आलेल्या आयस्क्रीम वर यथेच्छ ताव मारून व ते झाल्यावर कोणाचेही लक्ष जाऊ नये अशा कोनात उभे राहून तोंडाच्या वरच्या व खालच्या जबड्याच्या मधला हाड नसलेला जिभरूपी वळवळणारा अवयव बाहेर काढत मी शक्य तेवढा लांब करत त्या आयस्क्रीम कपाच्या तळाशी पोहोचवला व मौत का कुँवा मधील मोटारसायकलस्वाराने त्या लाकडी विहीरीवरून गोल मोटारसायकल फिरवावी त्या प्रमाणे जिभेचा एक सराईत फेरफटका मी त्या कपाच्या गोलाकार भिंतींवरून फिरवला.एका चक्कर मध्ये समधान न झाल्याने मी पटापट तीन चार चकरा मारल्या व आता जिंकायला जग उरले नाही असे सिकंदरासारखे लक्षात आल्यावर मग ओठांवर (स्वतःच्या) एकदा शेवटचा हात जिभेने फिरवत मी मोठ्या जड अंतःकरणाने आयस्क्रीम ला निरोप दिला.जाता जाता पुन्हा फक्त एकच गोळा घ्यावा असे मन मनोमन सांगत होते.पण इतर सोबत असलेल्या अनेक मित्रांची बाहेर फेरफटका मारायला जाण्याची खूप घाई सुरू झालेली असल्याने तो एक आल्हाददायक विचार निर्दयी जगापुढे टाकून द्यावा लागला.

मग काळे,टाकळकर,मकरंद,निलेश व इतर आम्ही काही जण त्या भुर भुर चालू असलेल्या पावसात आजूबाजूचा तो रमणीय परिसर पाहण्यासाठी बाहेर पडलो. गेटमधून बाहेर पडून आम्ही एका टेकडीवर चढण्यासाठी कूच करणार तोच कोणाच्यातरी मोबाईल वर फोटोसेशन साठी परत येण्याचा निरोप आला.फोटो काढायचाय हे समजल्यावर सगळ्यात वेगाने मागे जाणा-यांमध्ये पत्रकार मकरंद कुलकर्णी आघाडीवर होते.आम्ही वापस निघायचा विचार केला तोवर मकरंद गेट पर्यंत पोहोचलेला होता.त्याच्या मानसिकतेचा खोलवर विचार केला असता खरे कारण ओळखणे अवघड नव्हते.सतत कोणाचे न कोणाचे छायाचित्र चांगले चांगले मथळे टाकत वर्तमान पत्रात छापणा-या मकरंद अथवा कुठल्याही पत्रकाराचा शेवटचा फोटो मला वाटतं त्यांच्या लग्नात साल्याकडून कान पिळून घेतांना केलेल्या कडवट तोंडाचा असावा.आता अशा पार्श्वभुमीत इतक्या आग्रहाने कोणी बोलवतय म्हटल्यावर त्याला गहिवरून न आल्यास नवल.आम्ही परत गेटपर्यंत आलो तेव्हा सगळे एकमेकांना फोटो काढण्यासाठी खालच्या बाजूला जाण्याचा आग्रह करत होते.हळू हळू रमत गमत सगळे खाली हिरवळीवर गोळा होऊ लागले.

त्यावेळेस एक उंच व किरकोळ देहयष्टीची वयस्कर व्यक्ती खुर्च्या व माणसं यांची सांख्यीकी जुळवत होती.काही वेळाने सगळी गोळाबेरीज बरोबर आल्याचे समाधान चेहे-यावर ठेवत त्याने सर्वांना आपआपल्या जागा पकडण्यास सांगीतले त्यावरून तोच आम्हाला शूट करणार असल्याचे समजले.उजव्या हातात कॅमेरा,गळ्यात लटकावलेला कॅमे-याचा पट्टा,केसांच्या मानाने खूपच पांढरी असलेली व एका कल्ल्यापासून सुरू होत दोन्ही ओठांभोवती गोल फिरून परत दुस-या कल्ल्यापर्यंत पोहोचलेली कोरीव दाढी,ओठांच्या हे दाढीभोवती झालेले बेटावर पोहोचण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडीया च्या लोगोच्या मध्यात खालच्या बाजूला असतो तसा खालच्या ओठाच्या खालून वर जाणारा रस्ता,चेहे-यावर (सतत)मॅच हरलेल्या अझहरुद्दीनच्या चेहे-यावर टीव्ही चॅनेलच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसायचा तो प्रचंड तणाव,कपाळावर थेट अगदी व्रात्य मुलांच्या वर्गावर बदली शिक्षकाच्या असाव्यात तसल्या आठ्या,आवाजात बाईने नणदेच्या उपद्व्यापी कार्ट्यांना रागवताना असते तशी विचारतली जरब पण आवाजात रुपांतरीत होताना व्यक्त होत असलेला भेदरलेपणा हे सर्व त्या फोटोग्राफर च्या चेहे-यावर लिहिलेले होते.त्याने प्रत्येक वेळेस केलेल्या शांत राहण्याच्या आवाहनाला आम्ही जवळपास त्या काळात शिक्षकांनी केलेल्या शिस्तीच्या आवाहनाला गोंधळ करायचे आव्ह्यान समजून अजून गोंधळ वाढवायचो त्याप्रमाणे प्रतिसाद दिला.`मुलं तर चांगले वाढ झालेले दिसतायेत मग असला पोरकट पणा का?’ ह्या त्याच्या चेहे-यावरील प्रश्नाचे उत्तर `ही २३ वर्षांनी होणा-या मुलांची दहावीच्या वर्गाची रियुनियन आहे’ हे होते.त्या दिवशी प्रत्येक जण जणू आपले शालेय जीवन पुन्हा जगण्याचा प्रयत्न करीत होता.त्यामुळेच मुलं नुसताच त्या फोटोसेशन मध्ये गोंधळ घालून थांबले व जाताना त्या फोटोग्राफर च्या मागे एखादी चिठ्ठी वा शाईचा मोठा डाग पार्श्वभागावर आठवण म्हणून टाकायला विसरले याचेच आश्चर्य वाटते.त्यामुळे घरी गेल्यावर फोटोग्राफीरीण काकूंचा मोठमोठ्याने केलेला आरडाओरड्याचे प्रतिध्वनी आम्हाला त्या लोण्यावळ्याच्या द-याखो-यातून ऐकायला मिळाले नाही हेच दुर्देव.

फोटोग्राफर काकांनी ब-याच वेळ राष्ट्रपतींनी २६ जानेवारीच्या पुर्वसंध्यला केलेल्या भाषणाचा अनुवाद जसा तीन भाषांतून ऐकवतात तसा कदाचीत आम्हाला समजत नसेल म्हणून आलटून पालटून इंग्रजी,हिंदी व मराठी अशा भाषांचा केविलवाणा आधार घेत आम्हाला आपआपल्या जागांवर स्थिर उभे राहण्याचे पुन्हा आवाहन केले.मी माझी जागा शक्यतो मुन्शी राठी,हरीश चौबे,मिहीर राऊत,मकरंद कुलकर्णी यांच्या मागे येऊ न देण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून माझे अस्तित्व त्या छायाचित्ररूपी आठवणीत राहिले असते. शेवटी पाऊस सुरू झाल्याने मग त्यांनी घाईघाईत `शो युअर फेसेस’ रेडी…स्माईल प्लीज.. असे आवाज काढले.आता त्यांनी शो युअर फेसेस सांगतांना माझ्या कडे बघितल्याने मी चुकून माझा पार्श्वभाग दाखवत उलटातर उभा राहीलो नाही ना? असे वाटून मी गांगरून पाहत असतानाच `ओके थॅंक यू ‘या वाक्याने माझ्या काळजाचा घात केला.म्हणजे फोटो झाला काढून..?मला माझा चेहेराच काय तर पार्श्वभाग ही फोटोत आला नसणार याची खात्री होती.आणी हाय रे दैवा शेवटी माझी भिती खरी ठरली.घाई गडबडीत मी मिहीर व मकरंद यांच्या मध्ये सरकायचा प्रयत्न करीत असतानाच मिहीर च्या अवाढव्य शरीराच्या मागे मी कुठे दडला गेलो ते त्या परमेश्वरालाच माहीत.मला तर तो फोटोग्राफर चांगला दिसत होता मग त्या फोटोत माझा चेहेरा का आला नाही? असो..शेवटी काय हो शिवाजी महाराज,राणा प्रताप यांचे तरी कुठे छायाचित्रे आहेत पण त्यामुळे त्यांचे प्रभावी अस्तित्व कुठल्याच प्रसंगात लपले नाही….बाकी नाही म्हणायला माझा गोंडस,तेजस्वी,प्रेमळ चेहरा सोडला तर माझे केस,शर्ट,दोन डोळे ,भुवया,शर्टची दोनपैकी एक कॉलर इत्यादी जिनसा छायाचित्रात आल्या आहेत हेच ते काय कमी आहे..?( या सगळ्यात मिहीर,मकरंद,निलेश,आनंद,विनायक,महेश अरगडे वगैरे मंडळींनी कट रचून फोटोग्राफरला `हा आमच्या वर पुढे जाऊन लिहीणार आहे याला `कापा’ असे तर सांगून ठेवले नव्हते ना ही शंका मनात येत आहे.याचा पुरावा म्हणून महेशरावांनी आमच्या खांद्यावर मागून हात ठेवून आम्हाला मिहीरच्या मागे स्थानबद्ध केल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.)

`फोटोग्राफर ला इतका कॉंप्लेक्स झालेला पाहिला नव्हता’ अशी एक सार्वजनीक भावना मनात ठेवून आम्ही सगळे शक्य तेवढे चित्कार करत तेथून कॉन्फरंस रूम कडे सरकायला लागले.वर जाताना पुन्हा एकदा बाहेर एकेमेकांच्या कॅमे-यांनी फोटोसेशन झाले.यावेळेस मात्र मी शक्यतो अवजड वाहने टाळूनच ग्रुप फोटोत सहभागी झालो हे वेगळे सांगायला नको.

कॉन्फरंस रूम मध्ये आत आल्याबरोबर त्या टापटीप सुंदर हॉल मध्ये असलेली गोल गोल टेबलांभोवती असलेली खुर्च्यांची मांडणी,त्या टेबलांवर असलेले ते पांढरे शुभ्र टेबल क्लॉथ्स ,त्यावर असलेल्या त्या थाळ्या व त्या थाळ्यांमध्ये असलेली ती चॉकलेट्स पाहून आनंदरावांना सुर गवसला नसता तरच नवल.मग पुढच्या काही क्षणात त्यांनी दिसेल त्या टेबलावरचे चॉकलेट्स आपल्या मुठीमधे उचलायला सुरुवात केली.मग एका मुठीत मावेनात म्हणून दुसरी मुठ सोबत घेतली,मग दोन्ही भरल्या म्हणून खिशाचा आधार घेतला.पॅंटचे दोन्ही खिसे भरल्यावर वर शर्ट ला खिसा आहे असे समजून त्यांनी हात टाकला असता तो सरळ खाली आल्याने या टी शर्ट ला खिसा नसल्याचा साक्षात्कार त्यांना झाला व त्यांच्या चेहे-यावर आपण आज खिसे असणारा शर्ट घातला नसल्याची अपार खिन्नता दिसली.पण ते हार मानणा-यांपैकी नसल्याने त्यांनी मग हुशारी दाखवत आपली बसायची जागा आधी धरली व मग त्या टेबलवर दोन तीन चकरा मारत बरेचसे चॉकलेट्स एकत्र करून ठेवले.हे सगळे करतांना ते आपले परम मित्र मानसोपचारतज्ञ डॉ.विनय चपळगावकरांना एकदा `दाखवत’ का नाहीत अशी कुजबुज सुरू असतानाच असेच एक चॉकलेट दुस-याच्या टेबलावरून उचलताना काहींनी चपळगावकरांना पाहिल्याने आता मात्र `हे भगवान इन्हे माफ कर’ अशी अनाथपणाची भावना मनात आली.खरं सांगायचं तर त्यात काही मिन्ट च्या माझ्या आवडत्या चवी चे चॉकलेट्स पाहून हा प्रकार करायचा मोह मलाही आवरला नाही आणी आनंदच्याच टीम मधला भासवत मी पण त्या दंगलीत दुस-याचे घर लुटून घेतले.(आणी दंगलीच्या परिस्थितीचा फायदा उठवत दंगलीशी काहीही संबंध नसलेले लोक आपली जुनी भांडणे कशी निकालात काढतात हे औरंगाबादशी जुने संबंध असलेल्यांना चांगलेच माहीत असेल.)

फोटोसेशनच्या आधीपासून त्या काळातील आमच्या पाच शाळा मैत्रीणीही या रियुनियन मध्ये सामील झाल्या होत्या.ढीग भर मुलांच्या कळपात असणा-या बोटावर मोजण्याइतक्या कमी असणा-या मुलींना पाहून बहुतेकांना आश्चर्याचा (सुखद..) धक्का बसला.(त्यांना `मुली’ म्हटल्यामुळे माझा जाहीर सत्कार त्यांच्या त्यांच्या सासरच्या गावात त्यांनी आयोजीत केल्याची स्वप्न मला पडत आहेत पण मी एक सत्याचा आग्रह धरणारा लेखक स्वतःला समजत असल्याने त्यांना महिला म्हणणे जास्त योग्य व वास्तववादी राहील तरीही यापुढे `मुली’ हा शब्द त्यांनी स्वतःला उद्देशून व इतरांनी त्याजागी `महिला’ हा शब्द टाकून वाचावा म्हणजे दोहोंनाही वास्तववादी वाटेल. )अर्थात या मुली आमच्यासोबत होत्या हे मला बाहेर कुठे भेटल्या असत्या तर कदाचीत अजिबात ओळखूही आले नसते हे मी प्रांजळपणे कबूल करतो.( न करून सांगतो कुणाला..कुठल्याही महीलेकडे `ती ओळखीची वाटते का हो..? या सौभाग्यवतींनी विचारलेल्या प्रश्नाला `अजिबात नाही हे उत्तर द्यायची सवय लागली आहे.)मुळात त्या १० वी फ तुकडीत होत्या व तो वर्ग आम्हाला पहिल्यापासूनच परकीय शक्ती वाटत आला आहे.आमच्या मराठमोळ्या शाळेत असणारे ते एक आंग्ल माध्यम होते व आम्हा सर्व इतर तुकड्यांसाठी ते मेढेकर सरांनी अमेरीकेच्या म्युझियम मध्ये पाहिलेल्या चंद्रावरून आणलेल्या त्या दगडाइतकेच कुतुहलपुर्ण होते.मास पी टी ला बाहेत पटांगणात उभे राहिल्यावर ह्या वर्गाची रांग `फ’ तुकडीजवळ येत असे त्या वर्गावर जळण्याची एक प्राचीन प्रथाही तेथे होती.काही खिलाडूवृत्तीची मुले त्या रांगेतील मुलांचे अंगठे दाखवून अभिनंदन करण्याचीही वार्ता असायची.स्वतः इंग्रहीविषयात जेमतेम पास होणा-या आमच्या एका मित्राने आठवीतून नववीत जाताना आपल्या पिताश्रींकडे `फ’ तुकडीत स्वतःला घालायचा बालहट्ट धरल्याचे समजले होते.पण पिताश्रींना `पुत्र ऐसा गुंडा’ नको असल्याने त्यांनी मोठ्या चतुरपणे पुत्रा ला `तिहीलोकी झेंडा’ गाडण्यापासून वाचवले होते.

हळू हळू सगळेच त्या कॉन्फरंस रूम मध्ये जमा होऊ लागले.बाजूच्या त्या प्रशस्त खिडक्यातून निसर्ग खरोखरच दृष्ट लागावी असा बहरला होता.त्या दिवशीचे वातावरण व तो स्नेहमिलनाचा प्रसंग, मला वाटत नाही पुन्हा प्रयत्न करूनही अशा पद्धतीने योग जुळून येईल.खिडकीकडील सर्व टेबल्स १० वी फ त ल्या मुलांनी व्यापला होता.त्यांची संख्याही खूप जास्त होती.उरलेल्या भागात इतर तुकडीतील मुले व १० वी फ त ल्या मुली असा एक अविस्मरणीय व अभुतपुर्व योग योगा योगाने जुळून आला.दरम्यान आयोजकांनी आपला एक टेबल स्टेज च्या जवळ समोरच्या बाजूला निश्चीत केलेला होता.त्यावर ते सगळी मुलांची यादी,कार्यक्रमाची रूपरेषा व सगळ्यात महत्वाचे म्हणजे जवळपास सगळ्यांकडे बाकी राहिलेल्या ५०० रुपयांची वसूली ही महत्वाची कामे करत बसली होती.मनिष ने मग त्या ठिकाणी लावण्यासाठी तयार केलेले एक मोठे बॅनर काढले.हर्षल,मनिष,जहागिरदार,अजय काळे व मिहीर यांनी आकाराने अर्ध्या असणा-या एका व्हाईट बोर्ड वर ते मोठे बॅनर लावण्याचा धाट घातला.`सरस्वती भुवन हायस्कूल,औरंगाबाद,१९८९ बॅच’ असे मोठ्या आकारात वर तर खाली `पुनर्मिलन’ असे शाळेच्या त्या देखण्या इमारतीच्या छायाचित्र बॅकग्राऊंड वर ठेवून लिहीलेले होते..सगळ्यात खाली अनेक विद्यार्थ्यांच्या हात वर करून नाचत केलेल्या भांगडा पद्धतीच्या नृत्याची छाया दाखवत खाली जल्लोष,जल्लोष असे लिहिलेले होते.वरील शाळेच्या आठवणींचा व पुनर्मिलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जल्लोष करायचा आहे ही कार्यक्रमाची रुपरेषाच जणू चित्ररुपाने मांडलेली होती.हा जल्लोष सहा वेळेस त्या बॅनर वर लिहीण्यामागे आयोजकांनी तो सहाही तुकड्यांनी करायचा आहे हा संदेष दिला होता की काय असे वाटते.तसे खरच असल्यास मला त्यांच्या कल्पकतेचे अभिनंदन करावेसे वाटते.(तसे नसल्यास त्यांनी माझ्या कल्पकतेचे अभिनंदन करावे.) ब-याच वेळ झटापट केल्यावर ते बॅनर व खालचा बोर्ड यांची सांगड होऊ शकणार नाही हे सर्वानुमते ठरले शेवटी ते बॅनर तो बोर्ड बाजूला करत मागच्या भिंतीवरच लावण्याचा निर्णय घेण्यात आला.मग सेलो टेप ने चारही भाग चिटकावत ते सुंदर बॅनर अखेर दिमाखात उभे राहिले.

जाता जाता…

अमेरिकेत आलेल्या `सॅंडी’ मुळे तेथे स्थित असलेल्या आमच्या अनेक बालमित्रांना त्यांनी कुल्फी खायला,पान थुंकायला,दुधाची पिशवी आणायला,कोप-यावर भाजी घ्यायला,कचरा टाकायला वा काहीच जमत नसेल तर सरळ सॅंडीला भेटायला बाहेर रिक्षास्टॅंड पर्यंत येण्याचा सल्ला देत आहोत.त्यामुळे तुम्हाला सॅंडी आमच्या निलम पर्यंत आणून सोडेल ( ती दोघे क्लासमेट्स आहेत )व तेथून तामिळनाडू मधून तुम्हाला आणायची स्पेशल व्यवस्था केली जाईल.त्या निमीत्ताने तुम्ही अमेरिकेतून परत भारतात याल व आपली भेट होईल.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home